न्यूयॉर्क : मागील एक वर्षपासून जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने सगळ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. सध्या लसीकरणामुळे आता कुठे जगातल्या काही देशांमध्ये परिस्थिती सामान्य होण्याच्या मार्गावर आहे. जगभरात करोनावर संशोधित झालेल्या लसींमुळे कोरोनाशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे. पण या सगळ्यात जागतिक आरोग्य संघटनेने मात्र वेगळाच इशारा दिला आहे.
“कोविड-१९ ने आत्तापर्यंत जगभरात ३३ लाखाहून जास्त जीव घेतले आहेत. आपण आता कोरोनाच्या दुसऱ्या वर्षात आहोत. पण हे दुसरं वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक भयावह असेल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि लसीकरण या दोन्हींच्या एकत्रित मदतीनेच आपण यातून बाहेर पडू शकू”, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी दिला आहे.
"#COVID19 has already cost more than 3.3M lives & we’re on track for the 2nd year of the pandemic to be far more deadly than the 1st. Saving lives & livelihoods with a combination of public health measures & vaccination – not one or the other – is the only way out"-@DrTedros
— World Health Organization (WHO) (@WHO) May 14, 2021
जगभरातल्या कोरोनाच्या संकटाबाबत डॉ. टेड्रॉस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जगभरातल्या कोरोनाच्या परिस्थितीसोबतच चालू वर्षात करोनाचा नि:पात करण्यासाठी कशा पद्धतीने पावलं उचलणं गरजेचं आहे, याविषयी जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका मांडली. “या काळामध्ये लसीचा पुरवठा हे एक सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे.
मात्र, जगातील काही प्रमुख लस उत्पादक देश यासंदर्भात इतर देशांना मदतीचे धोरण अंगीकारत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. काही देशांनी लसींचा साठा इतर देशांना पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच काही लस उत्पादक कंपन्यांनी लसीचा फॉर्म्युला देण्याचीही तयारी दर्शवली आहे”, असे ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी डॉ. टेड्रॉस यांनी भारतातील परिस्थिती चिंतेचा विषय असल्याची भूमिका मांडली. त्यासोबतच इतरही काही देशांमधील परिस्थितीवर भाष्य केलं. “भारतातील परिस्थिती अजूनही चिंतेचा विषय आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मृतांचे आकडे वाढत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने भारताला मदतीचा हात दिला असून आत्तापर्यंत १ हजार ऑक्सिजन सिलेंडर, तात्पुरत्या आरोग्य सेवांसाठी टेंट, मास्क आणि इतर वैद्यकीय गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत”, असे टेड्रॉस म्हणाले. “मात्र, तातडीने मदतीची गरज असलेला भारत हा एकमेव देश नाही, असे अनेक देश असल्याचेही त्यांनी म्हटले.