जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड शहरासह तालुक्यात कोरोनाने फासा घट्ट आवळला असुन आज कोर्ट गल्लीतील एका 84 वर्षीय व्यक्तीचा नगर येथे उपचारादरम्यान कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. हा कोर्ट गल्लीतील कोरोनाचा दुसरा बळी ठरला असून आता पर्यंत कोरोनामुळे मुत्यू झालेल्यांची संख्या 11 झाली आहे शहरातील कोर्ट गल्ली सर्वाधिक रुग्ण आढळून आलेला परिसर ठरला असून धक्कादायक बाब म्हणजे अद्याप पर्यंत हा परिसर कंटेनमेंट झोन करण्यात आला नाही.
जामखेड शहरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे आता पर्यंत 300 कोरोनाबाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले असून रोज निघणारी आकडेवाडी धडकी भरवणारी येत आहे. आज शहरात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसुन तालुक्यातील तरडगाव 10, धोंडपारगाव 1, जातेगाव 1,पिंपळगाव आवळा 1 असे एकुण 13 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
दरम्यान, शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असलेल्या कोर्ट गल्लीतील पुन्हा एका ८४ वर्षीय व्यक्तीला त्रास होत असल्याने उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले होते,मात्र बीड येथील एका खाजगी हॉस्पिटल डॉक्टरानी त्याना दाखल करून घेण्यास नकार दिल्याने सदरील व्यक्तीला त्यांचे नातेवाईक पुन्हा जामखेड येथे घेऊन त्याचदिवशी दि १७ रोजी जामखेड मधील खाजगी लॅबमध्ये त्या व्यक्तीचे स्वॅब तपासणी देण्यात येऊन सदरील व्यक्ती त्याच्या उपचारासाठी दाखल करून न घेता स्वतःच्या घरी सोडण्यात आले.
त्यानंतर दोन दिवसांनी दि १९ रोजी दुपारी ३ वाजता सदरील व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटूंबियांनी त्याना पुढील उपचारासाठी आरोळे हॉस्पिटल येथील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले.
त्याठिकाणीही त्या व्यक्तीसह कुटुंबीयांची रॅपीट अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये त्या व्यक्तीचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून नेमका कोणाचा अहवाल ग्राह्य धरण्याचा असा प्रश्न उपस्थित होत असून सदरील व्यक्तीची प्रकृती ठासाळ्याने नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे आज दि 22 रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
एकट्या कोर्ट गल्लीतील कोरोनामुळे मुत्यू झालेल्यांची संख्या 2 झाली आहे तर आता पर्यंत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण याच कोर्ट गल्लीत सापडलेले असताना प्रशासनाकडून अद्याप पर्यंत हा परिसर कंटेनमेंट झोन करण्यात आला नाही त्यामुळे वेगाने कोरोनाचा फैलाव झाला आहे नगरपरिषदेच्या वतीने या भागात येणाऱ्या रस्त्यावर फक्त पत्रे लावण्याचे काम करण्यात आले प्रशासनाला वारंवार मागणी करूनही अद्याप पर्यंत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.