नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत करोनाचा कहर झाला असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असलेल्या दिल्लीने मुंबईलाही मागे सोडले आहे. देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासून सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत मुंबई पहिल्या क्रमांकावर होती. दिल्लीत ३ हजार ७८८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे दिल्लीतील रुग्णसंख्या ७० हजारांच्या पुढे गेली आहे.
करोना रुग्णसंख्येत देशाची राजधानीने आर्थिक राजधानीला मागे टाकले आहे. बुधवारी दिल्लीत ३ हजार ७८८ जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झाले. त्यामुळे दिल्लीतील रुग्णसंख्या ७० हजार ३९० वर पोहोचली. तर मुंबईतील रुग्णसंख्येत १ हजार ११८ रुग्णांची भर पडली, त्यामुळे मुंबईतील आकडा ६९,५२८ इतकी झाली आहे.
दिल्लीमध्ये आतापर्यंत ४.२ लाख टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर मुंबईत २.९४ लाख टेस्ट करण्यात आल्या आहेत. पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मुंबई दिल्लीपेक्षा जास्त आहे. मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट २३.२ टक्के, तर दिल्लीचा १६.७ टक्के आहे. रुग्णांच्या मृत्यूची संख्या मुंबईत दिल्लीपेक्षा जास्त आहे. मुंबईत करोनामुळे ३ हजार ९६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत २ हजार ३६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाउन शिथिल केल्यानंतर दिल्लीतील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले. अनलॉक जाहीर केल्यानंतर दिल्लीत रुग्णांची वाढल्यानं काही दिल्ली सरकारने हरियाणाकडील सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर दिल्लीतील रुग्णालयामध्ये राज्यातीलच लोकांवर उचपार करण्यात यावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर उपराज्यपालांनी या निर्णयात बदल केला होता. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिल्लीतील करोना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लक्ष घातले आहे.