नवी दिल्ली – अलिगड विद्यापीठात करोनाने हाहाकार माजवला असून तेथील किमान 33 जण या आजाराने दगावले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी येथे तातडीने केंद्रीय पथक पाठवावे अशी मागणी या भागातील बहुजन समाज पक्षाचे खासदार कुवॅंर दानिश अली यांनी केली आहे.
पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, करोना विषाणूच्या नवीन प्रकारातून अलिगड मुस्लीम विद्यापीठात अत्यंत भयानक स्थिती उद्भवली आहे. या विद्यापीठाच्या स्थिती बाबत जगभरात पसरलेल्या माजी विद्यार्थ्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. येथे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरची टीम त्वरित पाठवण्याची गरज आहे. या विद्यापीठाचे स्वत:चे एक मेडिकल कॉलेज आहे पण तेथील परिस्थतीही अत्यंत खराब आहे असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. कोविडचा तेथे एक नवीनच व्हेरियंट आढळून आल्याने त्यावर त्वरेने संशोधन व उपाययोजना केली गेली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
या विद्यापीठाच्या आवारातील सर्वांनाच या विषाणूच्या भीतीने ग्रासले असून त्या सर्वांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची गरज आहे असेही दानिश अली यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान या विद्यापीठाचे कुलगुरू तारीक मन्सर यांनीही आयसीएमआरला पत्र लिहुन या विद्यापीठाच्या परिसरात कोविडच्या एखाद्या नवीन विषाणूंचा फैलाव झाला आहे काय याच्या तपासणीची मागणी केली आहे.