नवी दिल्ली – भारतासह गरीब आणि इतर विकसनशील देशांमध्ये करोनाचा श्रीमंतापेक्षा गरीब जनतेवर जास्त परिणाम झाला आहे. या दृष्टिकोनातून आगामी काळात या देशांनी आर्थिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेच्या पदवीदान समारंभात बोलताना दास यांनी सांगितले की भारतासारख्या देशाने आगामी काळामध्ये गरीब आणि मध्यमवर्गीयाची क्रयशक्ती कशी वाढेल या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची गरज आहे. तरच देशांतर्गत मागणी वाढेल आणि उद्योगांची उत्पादकता वाढवून अर्थव्यवस्थेला आधार मिळेल.
दास यांनी सांगितले की, भारत सरकार पायाभूत सुविधांमध्ये खर्च वाढवीत आहे. खासगी क्षेत्राने या क्षेत्रात पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर आरोग्य, कामगार क्षेत्रामध्ये रेंगाळलेल्या सुधारणा मार्गी लावण्याची गरज आहे. तरच विकासदर दीर्घ पडल्यात वाढू शकेल.
भारत सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने करोनाच्या काळामध्ये अतिशय काळजीपूर्वक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर करोनाचा जास्त नकारात्मक परिणाम झालेला नाही. मात्र आगामी काळामध्ये विकास दर उच्च पातळीवर ठेवण्यासाठी विविध क्षेत्रात सुधारणा कराव्या लागणार आहेत.