नवी दिल्ली – इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही करोनाने एन्ट्री घेतली असून, तब्बल सात खेळाडू करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. या खेळाडूंना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यांच्या जागी कोणताही बदली खेळाडू देण्यात येणार नसल्याने त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना पुढे चाल दिली जाणार आहे, असे स्पष्टीकरण भारतीय बॅडमिंटन महासंघाने दिले आहे.
भारताचा स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा यांच्यासह तब्बल सात खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. भारतात सध्या करोनाचा कहर सुरू झाला असून, त्याचा फटका आता या स्पर्धेलाही बसला आहे. बाधित झालेल्या अन्य खेळाडूंमध्ये रितिका राहुल, त्रिशा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन अमान आणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व बॅडमिंटनपटूंची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ही माहिती समोर आली आहे.