व्यवसायावर संकट; वाहतुकीचे निर्बंध, साहित्याचा तुटवडा, आर्थिक चणचण
पुणे – लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसायांची गती कमी झाली. अडीच महिन्यांच्या काळात व्यवसाय ठप्प झाले. याला मूर्तिकारदेखील अपवाद नाहीत. दोन महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. मात्र, वाहतुकीचे निर्बंध, साहित्याचा तुटवडा, आर्थिक सावट आदी कारणांमुळे “विघ्नहर्ता’ घडवणाऱ्या मूर्तिकारांवर “विघ्न’ येणार असून, दरवर्षीपेक्षा मूर्ती कमी प्रमाणातच साकारण्यात येणार असल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात आले. गणपती बाप्पाने करोनाचे संकट दूर करावे, अशी प्रार्थना देखील करण्यात येत आहे.
लॉकडाऊन निर्बंधांचा फटका विविध व्यवसायांना बसत आहेत. कामगार देखील करोनाच्या भीतीने मूळगावी परतू लागले. त्यामुळे व्यावसायिकांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर देखील करोनाचे सावट आहे. सध्या, वाहतुकीवर अधिक प्रमाणात निर्बंध असणाऱ्या मूर्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा कच्चा माल मिळण्यास अडचणी येत आहेत. माती, रंग, साचे आदी साहित्य मूर्तिकारांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने काम ठप्प होत आहे.
आम्ही गेली 50 वर्षे मूर्ती तयार करतो. राजेंद्र देशमुख आणि मी अशी आमची ही दुसरी पिढी या व्यवसायात आहे. दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास काम सुरू होऊन जानेवारीमध्ये याला वेग येतो. मात्र, यावर्षी फेब्रुवारीमध्येच काम बंद झाले आहे. आम्ही दरवर्षी सुमारे सहा देशांमध्ये गणपती मूर्ती पाठवतो. पण, यंदा कच्च्या मालाची आवकच नसल्याने, परदेशात एकही मूर्ती पाठवता आली नाही. यंदा करोनाच्या भीतीने कामगार येणे शक्य नव्हते.
दरवर्षी 20 ते 22 कारागीर असतात. सध्या, केवळ 5 कारागीर आहेत, दरवर्षी स्थानिक बाजारासाठी सुमारे साडेतीन ते चार हजार मूर्ती आवश्यक असतात. मात्र, सध्या केवळ निम्म्या मूर्ती तयार आहेत. यावर्षी पेण आणि नगरहून येणाऱ्या मूर्तिंबाबत साशंकता आहे, असे नटराज आर्टचे भालचंद्र देशमुख यांनी सांगितले.