उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन : कोणीही घराबाहेर पडू नका
बारामती- करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना बारामतीत ही एक रुग्ण सापडला आहे. हे संकट आपल्या दारात आले असताना आपण घाबरून न जाता या परिस्थितीचा संयमाने मुकाबला करावा.
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कोणीही घरा बाहेर न पडता एकसंघता आणि संयमाच्या “बारामती पॅटर्न’चा राज्यासमोर आदर्श घालून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
“करोना’चे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे. आपल्या राज्यातही आलेले हे संकट आता आपल्या दारात आले आहे. बारामतीत सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. बारामतीतील काही परिसर सील करण्यात आला आहे, तसेच तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार अत्यंत खंबीर पावले उचलत आहे.
या संकटाचा विस्तार होऊ नये म्हणून आपण “लॉकडाऊन’चा पर्याय निवडला आहे. या संकटाला आपल्याला याच टप्प्यावर रोखायचे आहे. त्यासाठी कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपल्या बारामतीच्या पॅटर्नचा देशभारत लौकिक आहे, या लौकिकाला साजेसच या संकटाला आपण तोंड देऊ या. या संकटाचा सामना करण्यासाठी आपण सक्षम आहोत; मात्र या परिस्थितीत कोणत्याही अफवेला बळी पडू नका. नेहमीप्रमाणे एकसंघपणे या संकटाचा मुकाबला करू या. राज्य सरकार आणि प्रशासनाने केलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
- बारामती शहरात ज्या भागात करोनाचा रुग्ण आढळला आहे, त्या भागातील वाहतूक वळवण्यापासून अन्य आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. पूर्ण परिसर निर्जंतुक करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात येत आहे. कोणत्याही अफवांना बळी न पडता संयम राखत प्रशासनाकडून येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. सर्वांनी आपल्या घरातच थांबून या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करावी. गरज असल्याशिवाय घरातून कोणीही बाहेर पडू नये. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आपण सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
– सुप्रिया सुळे, खासदार - श्रीरामनगर परिसर तीन किमी सील – प्रांताधिकारी
श्रीरामनगर परिसरातील हा रुग्ण बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा त्रास वाढल्याने त्यास पुण्यातील ससूनला हलवण्यात आले होते. आता त्याला नायडू हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. संबंधित रुग्ण हा रिक्षा चालक असल्याने तो बारामती शहरात वेगवेगळ्या ठिकाणी त्याने रिक्षा फिरवली असावी. तसेच त्याच्या संपर्कात अनेक जण आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याची इतर नागरिकांना बाधा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकर्तता बाळगावी, घरातच राहावे, घराबाहेर फिरू नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी स्वतःहून “जनता कर्फ्यू’ लागू करून त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. श्रीराम नगर परिसराच्या आजूबाजूचा तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. नागरिकांची तपासणी केली जात आहे.