पिंपरी – करोना झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी केली जाते. त्याआधी करोना होऊन गेला आहे की नाही हे तपासण्यासाठी अँटिबॉडीजची (प्रतिपिंड) चाचणी केली जाते. गेल्या एक महिन्यांपासून शहरामध्ये खासगी प्रयोगशाळेत या चाचणीसाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. शरीरात प्रतिपिंड तयार झाली असतील तर आता करोना होणार नाही अशी नागरिकांची समजूत आहे. मात्र अँटिबॉडी तयार झाल्या असल्या तरी करोना होऊ शकतो. त्यामुळे सावध राहण्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
शहरात करोनाचा आलेख उतरणीस लागला आहे. शहरातील रोजची रुग्णसंख्या कमी झाली आहे. तरी देखील दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरामध्ये खरेदीसाठी नागरिक झुंबड करत आहेत. त्यामुळे पुन्हा शहरामध्ये करोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच शहरामध्ये सिरो सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये सुमारे नऊ लाख नागरिकांना करोना होऊन गेला असल्याचा अंदाज पालिका प्रशासनाने वर्तविला आहे. तर अनेक नागरिक खासगी प्रयोगशाळेत जाऊन शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत की नाही याची चाचणी करत आहेत.
अद्याप ठोस संशोधन नाही
करोना होऊन गेल्यावर शरीरात आयजीजी नावाची प्रतिपिंड तयार होतात. ते अनिश्चित काळापर्यंत टिकतात. मात्र प्रतिपिंड असल्यास प्रतिपिंड चाचणी पॉझिटिव्ह येते. या चाचणीला कोविड आयजीजी असे म्हणतात. मात्र या अँटिबॉडीज किती काळ शरीरात टिकतात. तसेच यामुळे करोनापासून संरक्षण होते का याबाबत अजून ठोस संशोधन झाले नाही. तसेच काही रुग्णांना करोना होऊन गेल्यानंतर पुन्हा करोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अँटीबॉडी करोनापासून किती संरक्षण करतील याबाबत साशंकता व्यक्त केली जात असून नागरिकांना अँटीबॉडीज विकसित झाल्या असल्या तरी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
चाचणी सर्वांसाठी खुली
काही दिवसांपूर्वी फक्त सिरो सर्व्हेसाठी ही चाचणी करण्याची परवानगी होती. शहरामध्ये त्यातून 34 टक्के नागरिकांना करोना होऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने ही चाचणी सर्वांसाठी खुली केली आहे. खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी केली जाते. तीन आठवड्यापूर्वी करोनाची काही लक्षणे दिसली तर चाचणी करण्यास हरकत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शरीरामध्ये अँटिबॉडीज आढळल्या तरी सावधानता पाळणे आवश्यक आहे. तीन महिन्यानंतर अँटिबॉडीजची क्षमता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
दुसऱ्या लाटेची प्रशासनाला भीती
पिंपरी चिंचवड शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांनी शहरामध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता दाट असल्याचे सांगितले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. त्यामध्ये नागरिक बेफिकिर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेकजण सामाजिक अंतराचे पालन करताना आढळत नाहीत. तसेच मास्कचा वापर करत नाहीत. त्यामुळे करोना विषाणूचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या या बेफिकिरीमुळे महापालिका प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे.
शरीरामध्ये “अँटिबॉडीज’ आढळत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र त्या किती प्रमाणात आहेत यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. साहजिकच जास्त प्रमाणात अँटिबॉडीज असतील तर त्या करोनाच्या विषाणूशी लढू शकतील. मात्र थोड्याप्रमाणात अँटिबॉडीज असतील तर त्या विषाणूंशी लढू शकणार नाही. त्यामुळे अँटिबॉडीज शरीरात असल्या तरी करोना पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम रुग्णालय.