लखनौ – करोना संकटामुळे उत्तरप्रदेशात निर्माण झालेल्या स्थितीचे चिंताजनक चित्र त्या राज्यातील एका मंत्र्यानेच पुढे आणले आहे. करोनाबाधितांसाठी रूग्णालयांत पुरेशा बेडस् नसल्याचे आणि रूग्णवाहिकांची कमतरता असल्याचे त्या मंत्र्याने चव्हाट्यावर आणले आहे.
उत्तरप्रदेशचे कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी राज्याच्या वरिष्ठ आरोग्य आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना नुकतेच एक पत्र पाठवले. ते पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये त्यांनी लखनौ जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या चिंताजनक स्थितीवर बोट ठेवले आहे.
करोनाविषयक चाचण्यांचे अहवाल येण्यास मोठा विलंब होत आहे. रूग्णांना वेळेत रूग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. त्या स्थितीवर लवकर नियंत्रण मिळवता आले नाही तर लखनौमध्ये लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशाराही त्या पत्रातून देण्यात आला आहे. त्यामुळे पाठक यांनी उत्तरप्रदेश सरकारला घरचा आहेर दिल्याचे मानले जात आहे. ते पत्र चर्चेचा विषय बनले असतानाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाबाधा झाल्याचे समोर आले. उत्तरप्रदेशात बुधवारी 20 हजार 510 नवे करोनाबाधित आढळले. ती संख्या त्या राज्यातील आजवरची उच्चांकी ठरली आहे.