नवी दिल्ली -पश्चिम बंगालमध्ये आता विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या सभा आयोजित न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे त्या राज्यातील उर्वरित दोन टप्प्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांच्या छोटेखानी सभा होतील.
निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच बंगालमधील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोठ्या सभा घेण्यावरून भाजपवर इतर राजकीय पक्षांकडून टीकेची झोड उठवली जात होती. अशात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी करोना संकट ध्यानात घेऊन बंगालमधील सभा रद्द केल्या. त्या राज्यातील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने तर उर्वरित टप्प्यांचे मतदान एकाचवेळी घेण्याची मागणी पुढे केली.
मात्र, निवडणूक आयोगाने ती फेटाळून लावली. बंगालमधील मोठ्या सभा हा चर्चेचा आणि टीकेचा विषय बनला असतानाच भाजपने सोमवारी आपला निर्णय जाहीर केला. त्यानुसार, भाजपच्या पुढील सभा जास्तीत जास्त 500 जणांच्या उपस्थितीतच होतील. दरम्यान, बंगालमधील सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार सोमवारी समाप्त झाला. त्या टप्प्यात 43 जागांसाठी 22 एप्रिलला मतदान होईल. त्यानंतर त्या राज्यात मतदानाचे दोन टप्पेच शिल्लक राहतील. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकूण आठ टप्प्यांत मतदान होणार आहे.