रिवा – देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. देशातील अनेक रुग्णालयं रुग्णांनी भरली असून रुग्णाला बेड मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयात मुख्य न्यायाधीश असलेले कमलनाथ जयसिंह पुरे यांचे ऑक्सिजन अभावी करोनामुळं निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
जागतीक महामारी ठरलेल्या करोनाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र दुसऱी लाट अपेक्षापेक्षा भीषण असल्याने वैद्यकीय यंत्रणा देखील कमी पडत आहे. रिवा जिल्ह्यात करोनामुळे न्यायाधीशांचा मृत्यू झाला. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना येथील संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान परिस्थिती ढासाळल्यानंतर न्यायाधीश कमलनाथ यांना ऑक्सिजन लावण्यात आला. मात्र शरीरात ऑक्सिजन पास न झाल्याने त्यांचं निधन झालं. रिवा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी इलैया राजा टी. यांनी या संदर्भात माहिती दिली.