नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात तर करोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. मात्र देशातील ४३० जिल्ह्यांमधून दिलासादायक बातमी समोर आली आहे.
देशातील तब्बल 430 जिल्ह्यांत मागील 28 दिवसांत करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. देशासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
देशात करोनाबाबतची स्थिती सध्या नियंत्रणात आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. त्यामुळे करोनाची नियमावली पाळा अशा सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केल्या आहेत.
दरम्यान महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रभाव अधिक आहे. देशात मागील एका आठवड्यात आढळून आलेल्या प्रकरणांपैकी 59.8 टक्के रुग्ण याच जिल्ह्यांमधील आहेत, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.