नवी दिल्ली – देशातील करोनाची स्थिती वाईटकडून अत्यंत वाईटकडे गेली आहे आणि हीच चिंतेची बाब आहे, असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केले. आरटी पीसीआर चाचण्या करण्यावर भर देण्याचा सल्ला देत तातडीने विलगीकरण, संपर्कातील व्यक्तींची चचाणी आणि आरोग्य सेवा सुधारण्याचा सल्लाही त्यांनी राज्यांना दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले, केवळ काही जिल्ह्यात बाधित मोठ्या संख्येने वाढल्याचे पहायला मिळत असले, तरी देशातील स्थिती चिंताजनक आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि प्राण वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवेत.
करोनाचे बाधित वाढत आहेत असे केंद्र शासित प्रदेश आणि राज्यांमध्ये चाचण्यांची संख्या वाढवायला हवी असे ते म्हणाले, यानंतर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, आम्ही राज्यांच्या प्रतिनिधींशी बोललो आहोत. रॅपीड अँटीजेन टेस्ट केवळ दाट लोकसंख्येच्या भागातच वापरावी असेही आदेश दिले आहेत.
बहुतांश राज्यांत विलगीकरण केले जात नाही. बाधितांना घरातच विलगीकरण करण्याचे आदेश दिले जातात. पण त्यांचे पालन होते की नाही हे पाहिले जात नाही. ते जर नियमांचे पालन करत नसतील तर त्यांचे संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक आहे, असे ते म्हणाले. जनुकीय संरचना तपासण्यासाठी 11 हजार 64 नमुने पाठवण्यात आले. त्यात युके व्हायरंटचे 807 तर द. अफ्रिका व्हायरंटचे 47 आणि ब्राझीलचा एक विषाणू प्रकार आढळला. देशातील सर्वाधिक बीादत आढळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बंगळुरू शहर, नांदेड, दिल्ली आणि अहमदनगरचा समावेश आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
देशाच्या पॉझिटिव्हिटी दर 5.6 टक्के आहे. महाराष्ट्रात साप्ताहिक सरासरी 23 टक्के आहे. पंजाबमध्ये ती 8.82 टक्के, छत्तिसगढ8 टक्के, मध्ये प्रदेश 7.82 टक्के, तमिळनाडू 2.50 टक्के, कर्नाटक 2.45 टक्के, गुजरात 2.2 टक्के आणि दिल्ली 2.04 टक्के आहे.