मुंबई – मागील काही दिवसांपासून करोना संसर्गाने महाराष्ट्रासह बॉलिवूडला देखील विळखा घातला आहे. अनेक सेलिब्रेटी करोनाबाधित आहेत. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘महाभारता’त इंद्रदेवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल यांचं 10 एप्रिल रोजी सकाळी करोनामुळं निधन झाले आहे.
सतीश कौल यांना करोनाची लागण झाली होती. ते 74 वर्षांचे होते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विटद्वारे अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. हिंदी आणि पंजाबी चित्रपटांसह त्यांनी सुमारे 300 चित्रपटांत काम केले. ‘महाभारत’, ‘सर्कस’ आणि ‘विक्रम बेताल’ यासारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम करूनही 74 वर्षीय सतीश कौल यांचे आयुष्य आजारपण आणि हालाखीत जात होते.
‘महाभारत’ मालिकेबरोबरच ‘आंटी नंबर १’, ‘कर्मा’, ‘जंजीर’, ‘खेल’, ‘राम लखन’, ‘खुनी महल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये सतीश कौल यांनी काम केले होते. एकेकाळी कोट्यावधीची संपत्ती असणारे सतीश कौल अखेरच्या काळात हलाखीचे जीवन जगत होते. त्यांची पत्नी आणि मुलगा त्यांना सोडून अमेरिकेत स्थायिक झाले होते.