थिरूवनंतपुरम – केरळात करोनाचे प्रमाण अजूनही नियंत्रणात न आल्याने राज्य सरकारने 48 तासांकरिता लॉकडाऊनसारखे निर्बंध जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार सरकारने बंद ठेवण्यास सांगितले आहे. आज सकाळपासून पोलिसांनी सर्वत्र जोरदार नाकेबंदी केली असून कोणत्याही खासगी वाहनांना विनाकरण प्रवास करण्यापासून रोखले जात आहे.
सर्व सरकारी कार्यालयांना आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना सुट्टी देण्यात आली आहे. केरळ राज्य परिवहन बसेसना निम्मेच प्रवासी घेऊन जाण्यास अनुमती देण्यात आली आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना केवळ पार्सल सेवा सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. दूध व भाजी विक्रीची दुकाने मात्र सुरू राहतील असे सरकारने स्पष्ट केले आहे. सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली असून त्यात पुढील निर्बंधांबाबतचे निर्णय घेतले जाणार आहेत.