बक्सर – देशात करोना संसर्ग थैमान घालत आहे. रुग्णवाढीसह आता मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मृतदेहांची विल्हेवाट लावणं देखील कठीण झालं आहे. बिहारमध्येही असच काहीस चित्र आहे. येथून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथील बक्सरच्या गंगा घाटावर मोठ्या प्रमाणात मृतदेह जमा झाले आहेत. त्यामुळं खळबळ माजली आहे.
सविस्तर वृत्त असं की, चौसा येथील महादेव घाटावर मृतदेहांचा खच साचला आहे. करोना काळात बक्सर जिल्ह्यातील चौसाजवळील महादेव घाटावरच्या एका फोटोने सगळेच हादरले आहेत. मृतदेहांनी गंगेचा महादेव घाटच भरला आहे. मात्र, या घटनेचा व्हिडीओ समोर येताच जिल्हा प्रशासनाचे हात वर केले आहेत. तसेच उत्तर प्रदेशातील मृतदेह येथे आणले जात आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
चौसाचे बीडीओ अशोक कुमार म्हणाले की, जवळपास 40 ते 45 मृतदेह असतील, जे वेगवेगळ्या ठिकाणाहून वाहून महादेव घाटावर आले आहेत. हे मृतदेह आमचे नाहीत, असंही जिल्हा प्रशासनानं सांगितलं. आम्ही एक पहारेकरी ठेवलाय, ज्याच्या देखरेखीखाली लोकांना जाळलं जात आहे. अशा परिस्थितीत हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत इथे येत आहेत. उत्तर प्रदेशातून येणाऱ्या मृतदेहांना रोखण्याचा मार्ग नाही. त्यामुळे आम्ही या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पार पाडत असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे.
दुसरीकडे रहिवाशांचं म्हणण आहे की, महादेव घाटावर दररोज १०० ते २०० मृतदेह येतात. हे मृतदेह जाळण्यासाठी पुरेसे लाकडं नसल्यामुळे मृतदेह नदीत फेकले जातात. त्यातून करोनाचा आणखी प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.