सातारा -जिल्ह्यात रविवारी आलेल्या करोना चाचण्यांच्या अहवालांनुसार बाधितांचा आकडा सव्वाशेच्या आत आला. बाधितांचे प्रमाण एकदम कमी झाले असताना करोनाबळींची संख्याही घटल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळला आहे. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष पाटील यांनी दिली. त्यामुळे करोनाबळींचा एकूण आकडा दीड हजारांच्या पुढे गेला आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना येळगाव, ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार सुरू असताना ढोकळवाडी, ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ, सातारा येथील 72 वर्षीय महिला, खटावमधील 63 वर्षीय पुरुष, रहितमपूर, ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय महिला, जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना कुडाळ, ता. जावळी येथील 70 वर्षीय पुरुष, अशा सहा बाधितांचा मृत्यू झाला.
535 नागरिकांनी केली करोनावर मात
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि करोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 535 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 363 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 37, कराड येथील 14, फलटण येथील 18, कोरेगाव येथील 28, वाई येथील 20, खंडाळा येथील 53, रायगाव येथील 41, पानमळेवाडी येथील 11, मायणी येथील 7, महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 9, दहिवडी येथील 14, खावली येथील 6, तळमावले येथील 17, म्हसवड 18, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 65 असे एकूण 363 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.