सामाजिक बांधिलकी जपत बिचुकलेकरांनी दिला अनोखा संदेश
सातारा प्रतिनिधी) – बिचुकले (ता. कोरेगाव) येथील अशोक काशीनाथ पवार हे मुंबई येथे मंत्रालयात कर्तव्य बजावत आहेत. करोना काळात सुट्ट्या नाहीत, गावी येता येत नाही. कुटुंबातील कोणी गावाकडे नाही, आता आपल्या शेतीचे कसे होणार याची चिंता त्यांना होती, मात्र बिचुकले ग्रामस्थांनी या करोना योद्ध्याला मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. पवार यांची सुमारे आठ एकर शेती फुलवण्याचे काम ग्रामस्थांनी करुन वेगळा संदेश दिला आहे.
बिचुकले येथील अशोक पवार हे गेल्या काही वर्षांपासून मंत्रालयात कार्यरत आहेत. मात्र गावातील सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. मुंबईत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी गावाशी नाळ तोडली नाही. वडिलोपार्जित शेती स्वत: पिकवायची हे ध्येय ठेवून ते अधूनमधून गावाकडे येत असतात. गावात कुटुंबातील कोणीही राहत नसतानाही पवार यांनी गावातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले होते. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या करोना योद्ध्याला सलग काम करावे लागत आहे. सुट्टी नसल्याने गावाकडे आपल्या शेतीचे काय होणार याची चिंता पवार यांना लागली होती. गावातील करोना योद्धा मुंबईत आपले कर्तव्य बजावत आहे ही बाब गावासाठी अभिमानस्पद असल्याने ग्रामस्थांनीही सामाजिक बांधिलकी जोपासली.
पवार यांची सुमारे आठ एकर शेती फुलवण्याचे काम ग्रामस्थांनी केले. अशोक पवार यांना गावी येता येत नसल्याने गावातील पिंटू माने यांनी त्यांची आठ एकर शेतात वरुण घेवड्याची पेरणी केली. रोहित गांधी यांनी खते, बियाणे पुरवली. खताचे पैसे नारायण पवार यांनी दिले. माजी सरपंच विठ्ठल पवार, हणमंत पवार, राजू पवार यांनीही मदतीचा हात पुढे केला. वैभव माने यांनी तणनाशकाची फवारणी केली. अशोक पवार यांचे बालपणीचे मित्र मनोहर पवार, वैभव पवार हे सध्या त्यांच्या शेतीची देखभाल करत आहेत. बिचुकले ग्रामस्थांनी जिल्ह्याला अभिमानास्पद असे काम करुन वेगळा संदेश दिला आहे.