सातारा – क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाचे सर्व करोना वॉर्ड हाऊसफुल झाल्याने आरोग्य यंत्रणेला शनिवारी शहरातील खासगी हॉस्पिटलचा ताबा घ्यावा लागला. सदरबझार परिसरातील संजीवन हॉस्पिटलमध्ये शनिवारी 15 संशयित रुग्ण दाखल करण्यात आले.
सातारा जिल्हयात सध्या 485 रूग्ण करोनाने बाधित असून आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. करोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा जीवतोड मेहनत घेत आहे. असे असतानाही सातारा जिल्ह्यात पुणे, मुंबईतून तसेच बाहेरून आलेल्या लोकांमुळे संख्या वाढली. जिल्हयातील इतर करोना केअर सेंटरच्या तुलनेत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकांवर कामाचा प्रचंड ताण आहे. जिल्हा रुग्णालयात 20 रुग्णांची क्षमता असलेला एक वॉर्ड असे तब्बल बारा वॉर्ड आहेत. म्हणजे तब्बल 240 रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मात्र, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयात जागा अपुरी पडू लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी साताऱ्यात काही खासगी हॉस्पिटल्सशी यापूर्वीच चर्चा सुरू केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या तशा लेखी सूचनाही होत्या. मात्र चर्चा आणि काही तांत्रिक गोष्टींवर गाडे अडकले होते. मात्र शनिवारी दुपारी जिल्हा रुग्णालयाचा शेवटचा बारावा वॉर्ड रूग्णांनी फुल्ल झाला.
तत्पूर्वीच तयारी म्हणून जिल्हा रुग्णालयाने सदरबझार येथील पन्नास खाटांची क्षमता असलेले संजीवन रुग्णालय ताब्यात घेतले. दुपारनंतरचे पंधरा संशयित रुग्ण संजीवन हॉस्पिटलला स्थलांतरित करण्यात आले. हे हॉस्पिटल आता पूर्णपणे करोना उपचारासाठी आरक्षित राहणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी सांगितले.