मुंबई – आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार शनिवारी राज्यात 2701 नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1765 रुग्ण हे मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज करोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यात आज एकूण 1327 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.00 टक्के इतके झाले आहे तर मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 9806 वर पोहोचली आहे. तर देशात गेल्या 24 तासात 8329 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजार 370 वर पोहोचली आहे. दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीपासून करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे.