उपनगरांत, तर्कवितर्कांना उधाण : काळजी घेण्याचा एकमेकांना सल्ला
कोंढवा – उपनगरांतील यात्रा-जत्रांचा मुहूर्त याच महिन्यात असतो. या पार्श्वभूमीवर या दिवसांत उत्सवाची मोठी तयारी केली जाते; परंतु करोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असताना यात्रा-जत्रेच्या माध्यमातून मोठी गर्दी करणे चुकीचे ठरणार असल्याच्या कारणातून उपनगरांतील अनेक ठिकाणच्या यात्रा-जत्रा रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोंढवा बुद्रुकची यात्रा रद्द करण्यात आली असून फुरसुंगी गावचीही यात्रा याच महिन्यात असल्याने याबाबतही शाशंकता निर्माण झाली असल्याची चर्चा आहे.
कोंढवा बुद्रुक गावची यात्रा प्रत्येक वर्षी गुढीपाडवा सणाच्या दोन दिवस अगोदर नियमितपणे साजरी होत असते. त्याची पूर्व तयारी म्हणून धुलिवंदनाच्या दिवशी सदर यात्रेचे नियोजन होत असते. यावर्षी देखील सदर यात्रा शनिवार (दि.21) ते सोमवार (दि.23) या कालावधीत साजरी होणार होती; परंतु सध्या असलेल्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे सदर यात्रा रद्द करण्यात आली आहे, असे उस्तव कमिटी प्रमुख जालिंदर कामठे, गणेश कामठे, साहेबराव धांडेकर, मधुकर धांडेकर, वस्ताद बाबुराव कामठे, माऊली कामठे, शामशेठ मरळ, बजरंग वाघ, सुखदेव लोणकर, राकेश कामठे, शिवाजी मरळ, अनिल कामठे, उमेश कामठे, राहुल कामठे यांनी सांगितले. सदरची यात्रा रद्द करून मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी टाळून करोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा स्तुत्य निर्णय असल्याची चर्चा गावासह पंचक्रोषित आहे.
उपनगर तसेच पालिकेत समाविष्ट गावांतील यात्रा-जत्रा उत्सवांना सुरुवात होऊ लागली आहे. मात्र, करोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात्रा-जत्रा उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यातून करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे यात्रा-जत्रांवर करोनाचे सावट पसरल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात करोना बाधीत पाच रूग्ण आढळल्याने उपनगरातही भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. त्यातही मांजरीमध्ये बाधीत रूग्ण आढळल्याने उपनगरांत चर्चेला मोठे उधाण आले आहे. यातून नागरिकांमध्ये करोनाची भीती निर्माणझाली आहे.
उपनगरांतील अनेक यात्रा या महिन्यांत होत आहेत. यात्रा-जत्रांमध्ये मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्रित येत असतो. करोना आजाराचा प्रादुर्भाव गर्दीत वेगाने होत असल्याने गर्दी करणे टाळण्याबाबतचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. सर्दी, खोकला आणि ताप असलेल्या रुग्णांनी तर गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. जेणेकरून त्याचे संक्रमण इतर लोकांना होण्यापासून बचाव होईल. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल लावावा, यामुळे प्रादुर्भाव टाळता येईल. आपले हात स्वच्छ धुणे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. पालिका प्रशासनाकडूनही खबरादारीच्या सूचना करण्यात येत आहेत. मोबाइलच्या डायलर टोनद्वारेही करोना व्हायरसची जनजागृती करण्यात येत आहे.