नवी दिल्ली – केंद्र सरकारने येत्या डिसेंबर पर्यंत देशातील लसीकरणाची प्रक्रिया पुर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. पण सध्याचे लसीकरणाचे प्रमाण पहाता हे आश्वासनही फोल ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे असा दावा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केला आहे.
आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले की आज दिल्ली आणि ओडिशा राज्यात लसच शिल्लक नाहीं त्यामुळे त्या राज्यांची लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसींची उपलब्धता आणि त्याचे वितरण या बाबतच तपशील लोकांपुढे ठेवला पाहिजे अशी मागणीहीं चिदंबरम यांनी केली आहे.
देशात लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे ही वस्तुस्थिती आहे. लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दावेही खोटे साबित होत आहेत. लसींच्या आयातीचे मोठेच गूढ निर्माण झाले आहे. त्यामुळे डिसेंबर 2021 पर्यंत देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होईल ही बाब आता अशक्यप्राय दिसू लागली आहे असे ते म्हणाले.
आरोग्य मंत्री मांडविय यांनी लसीकरणाच्या संबंधातील नेमके सत्य लोकांपुढे मांडून त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले पाहिजे असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.