जयपुर – राजस्थानात करोना लसीचा तुटवडा निर्माण झाला असून आमच्याकडे आता केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतकीच लस शिल्लक आहे. नवीन साठा आला नाही तर आम्हाला हे लसीकरणाचे काम अर्धवटच सोडून द्यावे लागेल असा संदेश राजस्थान सरकारने केंद्र सरकारला दिला आहे. त्यावर केंद्र सरकारने म्हटले आहे की लसीचा तुटवडा नाही. आमचे लसीच्या पुरवठ्यावर पुर्ण लक्ष आहे.
राजस्थानला करोना लसीचे एकूण 37 लाख 61 हजार डोस पाठवण्यात आले आहेत, त्यातील त्यांनी 24 लाख 28 हजार डोसच वापरले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे पुरेसा लसीचा साठा उपलब्ध आहे असे केंद्र सरकारने म्हटले आहे. दरम्यान राजस्थान सरकारने म्हटले आहे की आम्ही रोज अडीच लाख लोकांचे लसीकरण करतो. या हिशोबाने आमच्याकडे सध्या केवळ 5 लाख 85 हजार डोसच उपलब्ध आहेत. हे डोस येत्या दोन दिवसांत संपतील त्यामुळे आम्हाला आणखी डोस मिळाले पाहिजेत.
लसीकरणाचे काम सुरूच ठेवायचे असेल तर राजस्थानला मार्च महिन्यासाठीच 60 लाख डोस मिळणे गरजेचे आहे असे राजस्थान सरकारच्या सूत्रांनी सांगितले. राजस्थान सरकारला जे एकूण डोस देण्यात आले होते त्यातील अडीच लाख डोस आम्ही लष्कराला दिले आहेत असेही या सूत्रांनी सांगितले.