नवी दिल्ली – करोना रूग्णांची वाढती संख्या पाहून जगभरातील सगळेच देश चिंतेत आहेत. करोनावर विजय मिळवायचा असेल तर लवकरात लवकर लसीकरण केले जाणे आवश्यक आहे. मात्र आज स्थिती अशी आहे की की देशांत कोट्यवधी लोकांना लस देण्यात आली आहे तर काही देश अजुनही लसीपासून वंचित आहेत.
सगळ्यांना लस द्यायची असेल तर लसीचे उत्पादन वाढवण्याची गरज असून तसे होताना दिसत नसल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे.
याबाबत संघटनेचे प्रमुख म्हणाले की काही देश तरूणांना लस देण्याची तयारी करत आहेत. वास्तविक त्यांना ज्येष्ठ नागरिकांपेक्षा कमी धोका आहे. पण त्यांच्यासाठी लस उपलब्ध होत नसल्याचे काही ठिकाणचे चित्र आहे. सगळ्या जगाला याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. असेच चालत राहीले तर आपण लोकांना केवळ सुरक्षेचा दिलासा देण्याचे चित्र निर्माण करू, त्यांना सुरक्षित करू शकणार नाही असे ते म्हणाले.
आरोग्य संघटनेने लसींच्या उपलब्धतेबाबत आणि असमान वितरणाबाबत विशेष काळजी व्यक्त केली आहे. एकीकडे श्रीमंत राष्ट्रे आपल्या संपूर्ण लोकसंख्येला लस देण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर जगातले असेही बरेचसे भाग आहेत की जेथे अजुन लस पोहोचलेलीच नाही. ही दरी आताच दूर केली गेली नाही तर नंतर सगळेच अवघड होउन बसेल असेही नमूद करण्यात आले आहे.