करोनाची वर्षपूर्ती झाली. या विषाणूने अख्ख्या जगाला वर्षभर घरात कोंडले. उद्योग ठप्प केले. अर्थकारण बिघडवले. लोकांचे अकाली मृत्यू झाले. एवढा हाहाकार माजवल्यावर त्याच्यावर उपाय सापडण्याची नितांत आवश्यकता होती. अनेक देशांच्या तज्ज्ञांनी झोकून देऊन काम सुरू केले. लसीची शोधमोहीम सुरू झाली. अखेर त्यात आता पहाट उजाडताना दिसते आहे. “फायझर’ या अमेरिकी कंपनीला मोठा पल्ला किंवा अंतिम पल्ला गाठण्यात यश आले आहे. विषाणू विरोधात परिणामकारक ठरेल अशी लस तयार केल्याचा दावा या बलाढ्य कंपनीने केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत लशीची उपयुक्तता 95 टक्के सिद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही खरेच मोठी बातमी आहे.
गेल्या काही काळापासून सगळ्यांचेच कान अशा सुखद बातमीच्या प्रतीक्षेत होते. मुळात कोणत्याही आजारावर लस तयार करणे सोपे काम नाही. त्याकरता वर्षानुवर्षे काम करावे लागते. सगळ्या चाचण्या आणि निष्कर्ष पडताळून पाहावे लागतात. धोक्याची कोणतीही शक्यता नाही ना, याची खातरजमा करावी लागते. त्यानंतर घोषणा केली जाते. जगात आतापर्यंत ज्या लसी तयार केल्या गेल्यात वा दिल्या गेल्यात त्यांचा हाच पॅटर्न होता. मात्र करोनाने तेवढी उसंत दिली नाही. वर्षभरात तो इतका वेगाने फोफावला की जंगलात वणवा फोफावल्याचा फिल त्याने दिला. बचावाचे सगळेच मार्ग बंद आणि कोणाकडून मदतीची आसही नाही. अशा स्थितीत प्रत्येकालाच झगडावे लागते. अनेक देशांनी प्रयत्न सुरू केले. त्यात आता “फायझर’ आणि दुसरी अमेरिकेचीच “मॉडर्ना’ या दोन कंपन्या यशाच्या समीप पोहोचल्या आहेत.
मध्यंतरी रशियाने “स्पुटनिक’ लसीच्या उपयुक्ततेचा दावा केला. मात्र त्या आघाडीवर फारशी उत्सुकता अजून दिसून आलेली नाही. आता फायझरने 95 टक्के यशाचा दावा केल्यामुळे सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला असणार. मात्र येथेच विसंबून राहिले तर मोठी गल्लत होणार आहे. त्याला कारण कोणतीही नवी वस्तू घ्यायची म्हटली की, अगोदर विश्वासार्हता सिद्ध व्हावी लागते. फायझरचेही तेच आहे. लस परिणामकारक ठरली असली तरी अडथळ्यांची शर्यत आहे. ते दूर झाले तरच ही बातमी भारत आणि जगातल्या अन्य बऱ्याच देशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. अन्यथा धोका कायम रहे, अशी स्थिती आहे.
दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याकडे लक्ष वेधले आहे. कोणतीही लस सुरक्षित ठेवण्याची एक प्रक्रिया असते. फायझरची लस उणे 70 अंश सेल्सियस तापमानामध्ये ठेवावी लागणार आहे. तसेच ज्याला पहिला डोस दिला आहे, त्याला तीन आठवड्यांनंतर दुसरा डोस द्यावा लागणार आहे. हीच भारत आणि अन्य विकसनशील देशांसाठी मोठी समस्या आहे. कारण लशीची वाहतूक, साठवणूक आणि प्रत्यक्ष लस देण्याची प्रक्रिया याकरता पायाभूत सुविधांची गरज आहे. तेवढ्या कोल्ड चेनची अर्थात शीतगृहांची आवश्यकता आहे. जी व्यवस्था सध्या आपल्याकडे पर्याप्त नाही. त्यातल्या त्यात शहरी भागात काही सुविधा होऊ शकतात. मात्र ग्रामीण भागात इतक्या कमी काळात अत्यंत वेगाने या सुविधा निर्माण होऊ शकत नाहीत.
अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीच्या लशीलाही यश मिळणार आहे. मात्र ती लस जरी आली तरी याच अडचणी कायम राहणार आहेत. मध्यंतरी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटतर्फे एक वक्तव्य करण्यात आले होते. लस तयार होईलच. मात्र त्याच्या पुढच्या प्रक्रियेसाठी जो खर्च होणार आहे, त्यासाठी आपण तयार आहोत का, अशा आशयाची शंका त्यात उपस्थित करण्यात आली होती. अमेरिकेच्या दोन कंपन्यांच्या लसीचे दर सामान्यत: भारतीय रुपयांत तीन हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ही रक्कम फार मोठी असणार आहे. शिवाय ज्या प्रमाणात जगभरात तिची मागणी आहे, अथवा असेल त्या प्रमाणात तिची उपलब्धता हाही मोठा अडथळाच असणार आहे. एक गोष्ट आणखी संभ्रम वाढवणारी ठरणार आहे. त्यावर “आत’मध्ये चर्चा झाली असली तरी “बाहेर’ हा विषय अद्याप फारसा चर्चिला गेलेला नाही. तो म्हणजे एकाच वेळी पाच ते आठ कंपन्यांच्या लसी बाजारात आल्यावर काय? अशावेळी निवडीचे निकष काय? प्रत्येक जण आपल्या यशाचा आणि सुरक्षिततेचा व उपयुक्ततेचा दावा करणारच. कोणत्या निकषाच्या आधारे निवड केली जाणार?
फायझरने वय, लिंग, वर्ण, जगातला वेगवेगळा भाग अशा सर्वच ठिकाणी चाचण्या घेतल्या आहेत. त्यानंतरच त्यांनी 94 ते 95 टक्के यशाचा दावा केला आहे. साठी ओलांडलेल्या व्यक्तींनाही ही लस प्रभावी ठरेल, असे त्यांचे म्हणणे आहे. अन्य कंपन्यांच्या दाव्यांची पुष्टी करताना सध्याच्या वातावरणात तेवढा वेळ या विश्लेषणासाठी देता येणार का, याबाबतही प्रश्नचिन्हच आहे. मध्यंतरी असाही दावा केला गेला की, जगातल्या अखेरच्या व्यक्तीला लसीचा डोस देण्यास 2024 ची अखेर उजाडेल. तर भारतातील एका तज्ज्ञाने असाही दावा केला की भारतीयांची प्रतिकारशक्ती पाहता भारतीयांना लसीची गरजच पडणार नाही. याचाच अर्थ दिलासा अन् धोकाही अधोरेखित करणाऱ्या बातम्या आहेत. गेल्या काही दिवसांत बाधितांची संख्या पुन्हा वाढते आहे. लस मिळाली म्हणून लोक मनाने बिनधास्त झाले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बाधितांच्या संख्येने शिखर गाठले होते. रुग्णालये आणि तेथील खाटा कमी पडत होत्या. माणसे रस्त्यातच निरोप घेत होती. ऑक्टोबरमध्ये मात्र करोना संसर्गाला उतरती कळा लागल्याचे आश्वासक चित्र निर्माण झाले. पण दिवाळी आली आणि अनलॉकमुळे बेफिकीरीही आली.
सातत्याने सांगितलेले नियम पाळले जात असल्याचे चित्र अभावानेच दिसले. शहरी भागांत दंडाची भीती आणि काहीशी जागरूकता यामुळे मास्कचा वापर होत होता. ग्रामीण भागात मात्र करोना आहे की गेला, प्रश्न पडावा एवढा बिनधास्तपणा जाणवतोय. मास्क न घालणे, गर्दीने आणि घोळक्याने फिरणे आणि कोणतेही अंतर न पाळणे हाच समूहाचा खाक्या. युरोपात दुसरी लाट आली आहे. प्रगत देशांनी दाखवलेली शिथिलता त्यांच्या अंगलट आली. अमेरिकेतही चाचण्यांसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. खुल्या स्टेडियमवर चाचण्या घ्याव्या लागत आहेत. जर प्रगत देशांत ही स्थिती असेल, तर आपण अगोदरच स्वयंशिस्त पाळलेली बरी. तसे सांगण्यात आलेही होते. ते झाले नसल्यामुळे आता दुसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे.
डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अथवा जानेवारीत ती येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. याचाच अर्थ करोनाची लस सापडली, तरी ती तुम्हाला दिली जात नाही तोपर्यंत धोका कायम आहे. लस आणि आपण यातील अंतर फार मोठे आहे. ते कमी होईल तेव्हा होईल. मात्र तूर्त करोना आणि आपल्यातील अंतर वाढवायचे असेल तर शिस्त आणि केवळ शिस्त हाच एक पर्याय आहे.