नवी दिल्ली – सध्या देशात करोनाविरोधातील तीन लसींच्या चाचण्या सुरू आहेत. पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत ही लस उपलब्ध होण्याची आशा आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत लोकांनी करोना विषयक सुचनांचे पालन करावे, असे आवहन त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रमाणात यश आले आहे.
युरोपातील नेक देशांमधील मृत्यूदरापेक्षा भारतातील मृत्यूचे प्रमाण कमी आहे. देशातील रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण 78-79 टक्के आहे. हे प्रमाण जगभरात करोनामुक्तीचे अधिक प्रमाण असणाऱ्या देशांमध्येही सरस आहे.
देशात जरी एकूण करोनाबाधितांची संख्या 50 लाखापेक्षाही अधिक झाली तरी सक्रिय रुग्नांचे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा कमीच आहे. अमेरिकेतील चाचण्यांच्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात चाचण्या करण्याचा सरकारचा निर्धार आहे, असेही ते म्हणाले.