पुणे – करोना लसीकरणाने गर्भातील अर्भकांचेही रक्षण होते, असे मत बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले. याशिवाय कोविड-19 चा बालकांवर होणारा परिणाम, संरक्षणाची गरज, गर्भवती आणि स्तनदा मातांच्या लसीकरणासह, कोविडविषयीच्या विविध शंका आणि प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
राज्य आरोग्य विभागाने दिल्लीच्या लेडी हार्डिंग्ज वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालचिकित्सा विभागाचे संचालक डॉ. प्रवीण कुमार यांच्या ऑनलाइन मुलाखतीचे देशपातळीवर आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
“करोना परिस्थितीचा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर अनेक परिणाम संभवू शकतात. मुले जवळपास वर्षभरापासून घरातच आहेत. घरातील आजारपणे, पालकांचा रोजगार आदींचा तणाव त्यांच्या मनावर येऊ शकतो. ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. गप्प राहणे किंवा राग असे त्यांचे कृत्य असू शकते. अशावेळी मुलांची काळजी घेणाऱ्या सर्वांनी संयम ठेवण्याची आणि त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. मुले तणावात असतील, तर त्याची चिन्हे जाणवतील. त्यांचे वर्तन, आणि त्यातील बदलांचे निरीक्षण करा आणि त्यांना समजून घ्या,’ असा सल्ला डॉ. कुमार यांनी दिला.
“संभाव्य तिसरी लाट हा एक अंदाज आहे. त्यापासून मुलांचे संरक्षण करायचे असेल, तर नियमांचे पालन करून प्रौढांनी लस घेतली पाहिजे. याशिवाय गर्भवती तसेच स्तनदा मातांसाठीही लस आहे. यामुळे त्यांच्यासोबतच त्यांच्या गर्भातील अर्भकांचे आणि शिशूंचेही संरक्षण होऊ शकेल,’ असेही त्यांनी सांगितले.
एनसीडीसी/आयडीएसपीच्या डॅशबोर्डनुसार, करोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी 12 टक्के रुग्ण 20 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत. एका सर्वेक्षणानुसार, मुलांमध्येदेखील प्रौढ व्यक्तींइतकीच सामूहिक प्रतिकारशक्ती आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्यांची संख्या पहिल्या लाटेपेक्षा अधिक असल्याने, तुलनेने मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाणही अधिक आहे. आतापर्यंत मुलांमधील मूत्यूचे प्रमाण प्रौढांच्या तुलनेत कमी असले, तरी सहव्याधी असलेल्या मुलांमध्ये ते अधिक आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
“एमआयएस’ हा नवा सिंड्रोम”
“द मल्टीसिस्टीम इन्फेलेमेटरी सिंड्रोम’ (एमआयएस) हा लहान मुलांमध्ये तसेच कुमारवयीनांमध्ये आढळणारा एक नवा सिंड्रोम आहे. अनेक रुग्णांमध्ये कोविड संसर्ग उच्च प्रमाणात असतांना त्यानंतर दोन ते सहा आठवड्यांत हा सिंड्रोम आढळला असून, सातत्याने ताप येणे, इन्फेलेमेटरी लक्षणे आदी त्याची लक्षणे आहेत. याचे निदान होण्यासाठी अद्ययावत तपासण्या आवश्यक असतात. सर्व संशयित रुग्णांना एचडीयू/आयसीयू सुविधा असलेल्या रुग्णालयात पाठवले जाते. लवकर निदान झाल्यास, अशा सर्व रूग्णांवर उपचार करणे शक्य असल्याचे डॉ. कुमार यांनी यावेळी सांगितले.