मुंबई, दि. 6 – करोना संकट पूर्णपणे संपणार अशी अपेक्षा असतानाच ओमायक्रॉनने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण होत असल्याने चिंता व्यक्त होत असून बूस्टर डोससंबंधी चर्चा सुरु आहे. याबाबत केंद्र सरकाने पुढाकार घेत देशपातळीवर लवकर निर्णय घ्यावा, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, बुस्टर डोससंबंधी जी चर्चा सुरु आहे त्याबद्दल वेगवेगळा मतप्रवाह आहे. तो द्यायचा की नाही याबद्दल काहीतरी उत्तर दिले पाहिजे. त्यासंबंधी तज्ज्ञ लोकच सांगू शकतात.
दरम्यान यावेळी अजित पवारांना राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने नव्याने नियमावली जाहीर होणार का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनातील सर्वांचे यावर बारकाईने लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाहेरचे जे रुग्ण येतात त्यासंबंधी केंद्र सरकारनेही कडक भूमिका घेतली पाहिजे. जिथे-जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत तिथे नियमांचे पालन अतिशय काटेकोरपणे होते की नाही हेदेखील पाहिले पाहिजे.
याआधीदेखील आपण मार्च महिन्यात अनुभव घेतला होता. एक दांपत्य दुबईवरुन आले, त्यांच्यामुळे चालकाला करोना झाला आणि तेथून फोफावला. आताही देशातील इतर राज्यात एक-दोन रुग्ण दिसत होते. पण त्यांच्या फक्त कुटुंब नाही तर नातेवाईकांनाही लागण झाल्याचे दिसत आहे. याबद्दल देश पातळीवरच आरोग्य विभागाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने एकदा स्पष्ट भूमिका केली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.