मुंबई – राज्यामध्ये करोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने आज 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात दिवसभरात 23 हजार 644 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यभरात आतापर्यंत 10 लाख 16 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 76 टक्क्यांच्या जवळपास पोहोचले आहे.
राज्यात पहिला रुग्ण 9 मार्चला आढळून आला होता. त्यानंतर 25 मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये दररोज करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र जुलै महिन्यापासून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांवर पोहोचले आणि याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याने करोनामुक्त झालेल्यांचा 1 लाखाचा टप्पाही गाठला.जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या 2 लाखांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये तर तीन आठवड्यांमध्ये 3, 4 आणि 5 लाखांचा टप्पा गाठत सप्टेंबरमध्येही 7,8,9 आणि आज 10 लाखांचा टप्पा ओलांडण्यात आला आहे.