नवी दिल्ली – देशातील सहा वर्षावरील दोन तृतीयांश किंवा 67.6 टक्के नागरिकांना करोना होऊन गेला असल्याचे देशव्यापी सर्वेक्षणातून समोर आले असल्याचे सरकारने मंगळवारी सांगितले. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) जुन – जुलै महिन्यात केलेल्या चौथ्या राष्ट्रव्यापी सेरो सर्वेक्षणामधून ही बाब उघड झाली आहे. याचा अर्थ अद्याप 40 कोटी जणांना करोनाचा संसर्ग झाला नाही.
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, या सर्वेक्षणातून आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यातून कोणतीही गुंतागुंत निर्माण झालेली नाही. मात्र त्याचवेळी करोना योग्य वर्तणूक ठेवण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. हे सर्वेक्षण 21 राज्यातील 70 जिल्ह्यात घेण्यात आले. त्यात सात हजार 252 आरोग्य कर्मचारी आणि 28 हजार 975 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले.
सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मेळावे अथवा समारंभ टाळले पाहिजेत. अनावश्यक प्रवासाला प्रोत्साहन देऊ नये, असे सरकारने स्पष्ट केले.
दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी एका करोनाबाधिताचा मृत्यू कोणत्याही राज्यात अथवा केंद्र शासित प्रदेशात झाला नाही, असे राज्यसभेत सांगितल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी अभूतपूर्वरित्या वाढली पहिल्या लाटेत असणारी तीन हजार 95 टन वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेत नऊ हजार मेट्रिक टनवर पोहोचली, असे त्यात म्हटले आहे.
करोनाचे रुग्ण रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या संख्येने मरण पावले, अशा आशयाच्या प्रश्नाल उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या, आरोग्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अखत्यारीतील विषय आहे. ते दररोजचे मृतांचे आकडे केंद्राला कळवत असत.
शाळा सुरू करा
मुले विषाणूंचा संसर्ग अधिक चांगल्या पध्दतीने हाताळू शकतात, त्यामुळे प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार शहाणपणाचा ठरू शकेल. विषाणू स्वीकारण्याची क्षमता त्यांच्यात कमी असल्याने मुले विषाणूंचा संसर्ग अधिक चांगल्या पध्दतीने हाताळू शकतात. एकदा हा निर्णय घेतला आणि सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्यानंतर प्राथमिक शाळा सुरू करणे शहाणपणाचे ठरू शकते, असे डॉ. भार्गव यांनी स्पष्ट केले.