पुणे – सुरुवातीला करोनाबाधित मृतांची संख्या कमी असताना येरवडा आणि कैलास स्मशानभूमीमधील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्काराची सोय करण्यात आली. परंतु, मृतांची संख्या वाढल्यानंतर मात्र महापालिका प्रशासनाला स्मशानभूमीचे व्यवस्थापन करावेच लागले. त्यातूनच महापालिकेने शीतपेट्यांची खरेदी केली.
मृतांची संख्या 45 पेक्षा जास्त झाली. एका मृतदेहाला दहन करण्यासाठी लागणारा वेळ, अंत्यसंस्कारासाठी मेल्यानंतरही वाट पहायला लागणारी अगतिकता या सगळ्या गोष्टी घडत असल्याने महापालिकेने शीतपेट्यांचा निर्णय घेतला.
याशिवाय मृतदेह त्याठिकाणी सोडून ऍम्ब्युलन्सही तेथून हलू शकत नव्हती, पर्यायाने रुग्णालयांमध्ये तीन-तीन दिवस मृतदेह ठेवावे लागत होते. त्यातून होणारे दुष्परिणाम या सगळ्या गोष्टींचा विचार करून महापालिकेने शीतपेट्या घेण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला सहा शीतपेट्या घेण्यात आल्या; यामध्ये नंबर देऊन मृतदेह ठेवले जात होते. एका मृतदेहाचे दहन होण्याला किमान एक तास जात असल्याने अन्य मृतदेह या पेट्यांमध्ये ठेवण्यात येत होते. त्यामुळे ऍम्ब्युलन्स चालकांना तेथे ताटकळत बसावे लागले नाही. दोन्ही स्मशानभूमींमध्ये अशा शीतपेट्या महापालिकेने बसवल्या.