मुंबई – देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना रुग्ण संख्या वाढत असलेल्या चार राज्यांतून हवाईमार्गे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लागू केली आहे.
ठाकरे सरकारने लागू केलेल्या एसओपीनुसार महाराष्ट्रात हवाईमार्गे दाखल होणाऱ्या दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात येथील प्रवाशांना खालील नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
काय आहेत नियम?
दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट असला पाहिजे. म्हणजेच कोरोना टेस्ट बंधनकारक आहे.
कोरोना चाचणी महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी केलेली असणे अनिवार्य.
आरटी-पीसीआर रिपोर्ट नसलेल्या प्रवाशांना विमानतळावर स्वखर्चाने करोना चाचणी करावी लागणार.
चाचणीनंतर प्रवाशाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. मात्र फोन नंबर, पत्त्यासह सर्व माहिती देणे प्रवाशाला बंधनकारक असेल.
ज्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांच्याशी संपर्क साधून पूर्वीच्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.