मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 7 आणि 8 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून आरटी-पीसीआर करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याची खात्री केल्यानंतरच विधानभवनामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
अधिवेशनात मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनाही करोना चाचणी बंधनकारक असणार आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आज पार पडली. यावेळी तयारीचा आढावा घेण्यात आला. सभागृह तसंच विधानभवन इमारत येथे सर्व खबरदारीच्या उपाययोजना कार्यान्वित करण्यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ सदस्यांसाठी 5 आणि 6 सप्टेंबर रोजी करोना चाचणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 7 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या विधानमंडळाच्या अधिवेशनाकरिता उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी करोना विषाणू संसर्ग नसल्याबाबतचा अधिवेशनाच्या अगदी लगतपूर्वीचा अधिकृत प्रयोगशाळेचा अहवाल विधानमंडळ सचिवालयाकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.