लंडन – करोनाच्या जगभरातील रूग्णांची संख्या चार कोटींच्या पुढे गेली आहे. करोनात बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. भारतात तर सक्रिय बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ पटीने जास्त आहे. ही सकारात्मक बाब आहे व त्यातून निश्चितच दिलासा मिळणार आहे. मात्र करोनावर खात्रीशीर लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत धोका कायम आहे.
हे सगळे असताना आणखी एक काळजीची बातमी आहे. ती म्हणजे करोनामुक्त झालेल्यांना त्यानंतरही काही महिने लक्षणे जाणवत राहतात असा दावा संशोधकांनी केला आहे.
ब्रिटनमधील संशोधकांनी 58 रूग्णांची तपासणी केली. हे रूग्ण करोनामुक्त झालेले होते. मात्र त्यानंतर किमान दोन महिने त्यांना विविध त्रासांचा सामना करावा लागत होता. प्रत्येक व्यक्तीला सारख्याच प्रकारचा त्रास होतो अशातला भाग नाही. मात्र प्रत्येकाला वेगवेगळा काहीतरी त्रास जाणवत होता, असे आढळून आले आहे.
काही रूग्णांना दोन महिन्यांनंतरही सामान्य श्वास घेण्यास त्रास होत होता. तर काहींना फुफ्फुसाचा त्रास सुरू झाला. काहींना प्रचंड थकवा जाणवत असल्याचे आढळून आले. अशक्तपणाची तक्रार असणाऱ्या रूग्णांची संख्या 55 टक्क्यांच्या आसपास होती. किमान तीन महिने तरी रूग्णांना असा त्रास जाणवण्याची शक्यता या संशोधकांनी व्यक्त केली.