वॉशिंग्टन – गेल्या सुमारे दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जगात सर्वत्रच दैनंदिन खाण्याच्या वस्तू 30% महाग झाल्या आहेत. जगभरातील सर्वच देशांना हा महागाईचा फटका बसला आहे. करोना महामारीच्या काळात विस्कळीत झालेली पुरवठ्याची साखळी अद्यापही पूर्ववत न झाल्याने मागणी आणि पुरवठा यांमधील समतोल अद्यापही साधता येत नाही. त्याचा फटका बसून दैनंदिन खाण्याच्या वस्तू महाग झाल्या आहेत.
संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे या कालावधीमध्ये खाण्याच्या वस्तू 30 टक्के महाग झाल्या आहेत. दैनंदिन वापरातील खाद्यतेले आणि गहू यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने त्याचा परिणाम सर्व खाण्याच्या वस्तूंवर झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. या कालावधीमध्ये गव्हाच्या किमतीत पाच टक्के वाढ झाली आहे.
2011 नंतर प्रथमच खाण्याच्या वस्तूच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आगामी कालावधीमध्ये जागतिक महागाईचा दर पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकतो. ब्राझीलमध्ये हा दर दहा टक्के तर अर्जेंटिना मध्ये 50 टक्क्यांच्या दरम्यान असू शकतो असेही संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.
विविध नैसर्गिक आपत्तींमुळे महत्त्वाचे धान्यांचे उत्पादनांवर झालेला परिणाम, त्यानंतर उत्पादन क्षेत्रावर झालेला परिणाम आणि कामगारांची टंचाई, वाढती बेरोजगारी या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून खाण्याच्या वस्तू खूप महाग झाल्या आहेत.
ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटनंतर कामगारांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे तर मलेशियामध्ये परदेशी मजुरांची टंचाई जाणवत असल्याने पाम तेलाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. जर्मनी दक्षिण कोरिया यासारख्या देशांमध्ये गेल्या दहा वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे भारतातील महागाईचा दर 4.35 टक्के असून इतर देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती समाधानकारक आहे.