वुहान: भारताने एकीकडे १०० कोटींच्या लसीकरणाचा मोठा टप्पा पार केला असून त्याचा आनंद सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे चीनने मात्र पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव झाला असल्याने जगाची चिंता वाढली आहे. चीनमध्ये मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे चीनने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनने आपली हवाई सेवा काही वेळासाठी खंडित केली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक विमानांचे उड्डाण रद्द केले आहेत. काही ठिकाणी शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत.
अनेक ठिकाणी लॉकडाउनही लावण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तर आणि पश्चिमेकडील शहरांमध्ये वेगाने करोनाचा फैलाव होत आहे. देशाबाहेर आलेल्या काही प्रवाशांना यासाठी जबाबदार ठरवले जात आहे. करोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात चाचणी केली जात असून अनेक पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. तसेच मनोरंजनाच्या अनेक ठिकाणी टाळं लावण्यात आलं आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही भागांमध्ये तर लॉकडाउन लावण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे चीनच्या लांजाऊ भागात लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर घराबाहेर पडणाऱ्यांना करोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले असून उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.
करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने Xi’an आणि Lanzhou येथे ६० टक्के विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. इतकेच नाही तर मंगोलिया येथील भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने कोळशाच्या आयातीवरही परिणाम होण्याची भीती आहे. सध्या चीनमध्ये गेल्या २४ तासाच १३ नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र एकही अॅक्टिव्ह रुग्ण आढळू नये यासाठी चीनकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळेच एकही रुग्ण सापडला तरी चिनी प्रशासन गांभीर्याने घेत आहे.