नवी दिल्ली – करोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी ज्या उपाययोजना लागू केल्या जातील, त्याद्वारे जनजीवनावर परिणाम होऊ देऊ नये अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. करोना रुग्ण वाढत असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधानांनी संवाद साधला. त्यावेळी स्थानिक पातळीवरील उपाय योजना आणि लसीकरणावर भर देताना त्यांनी सर्वसामान्यांच्या जनजीवनावर परिणाम होऊ न देण्याची सूचना केली.
लसीकरणाची प्रभावीपणे राबवण्यासाठी “हर घर दस्तक’ या कार्यक्रमाला वेग देण्याचे आवाहनही त्यांनी केले. लसीकरण 100 टक्के होण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे.
देशभरात 10 दिवसात सुमारे 3 कोटी किशोरांना लसीकरण करण्यात आले आहे. यातूनच भारताची क्षमता आणि आव्हानाला सामोरे जाण्याची सिद्धताही दिसून येते. भारतात उत्पादित करण्यात आलेल्या लसी जगभरात श्रेष्ठ सिद्ध होत आहेत. देशभरातील 92 टक्के प्रौढांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर 70 टक्के नागरिकांना दुसरा डोस दिला गेला आहे, ही अभिमानाची बाब आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
करोनाच्या साथीशी मुकाबला करण्यासाठी राज्यांनी स्वयंस्फूर्तीने, सक्रियपणे आणि सर्व समावेशक भूमिकाच स्वाकारायला पाहिजे. आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना खबरदारीचा डोसही दिला जायला पाहिजे. तरच आरोग्य यंत्रणा समर्थ होऊ शकेल, असेही पंतप्रधान म्हणाले.
उपाययोजनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनमानावर आणि पर्यायाने देशाच्याही आर्थिक व्यवहारांवर कमीतकमी परिणाम व्हायला हवा. कोणतीही प्रतिबंदात्मक उपाययोजना करताना ही बाब द्यानात ठेवणे गरजेचे आहे, असे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.