मुंबई – जीवघेण्या करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. देशातील काही राज्यात करोना रुग्णांची झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये राजधानी दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि मिझोरम या राज्यात करोना रुग्णांची वाढ होते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशातील पाच राज्यांना सावध केले आहे.
महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मिझोरम या राज्यांना केंद्राकडून अलर्ट देण्यात आला असून या राज्यांत करोना नियंत्रणात ठेवण्यासाठी पंचसूत्री राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांनी या पाचही राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पुन्हा एकदा निर्बंध लागणार का? मास्क सक्ती होणार का? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्रात तूर्तास नोंद घ्यावी अशी रुग्णसंख्या वाढलेली नाही. महाराष्ट्रात सध्या आढळणारी रुग्णसंख्येची गंभीर नोंद घ्यावी अशी नाही, त्यामुळे पुन्हा निर्बंध लावणं किंवा मास्कसक्तीचा कोणताही विचार नाही असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य विभागातर्फे निरिक्षण केले जात असून गरजेप्रमाणे पावले उचलली जात आहेत आणि सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका आहे. घाई करण्याची कोणतीही गरज नाही असेही आरोग्यमंत्र्यांनी म्हणाले आहेत.