पुणे – करोनावर विजय मिळवण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. शिवाय राज्यातील विभाग, जिल्हे, स्थानिक स्वराज्य संस्था यांचाही आढावा प्रशासनाने शुक्रवारी घेतला. प्रत्येक केंद्रावर 100 लस याप्रमाणे 28 हजार 500 लस एका दिवसात देण्याचा संकल्प आहे. राज्यात सुमारे साडेआठ लाख लाभार्थी आहेत. यातील प्रत्येक लाभार्थीला लसीचे दोन डोस दिले जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर लसीकरण मोहिमेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्यातील सर्व केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे. ज्या-त्या भागात असलेल्या केंद्रांवर स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या उपस्थितीत लाभार्थींना लस देण्याला सुरूवात केली जाणार असल्याचे राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये ते मुंबईतील कूपर हॉस्पिटल आणि जालना जिल्हा रुग्णालय येथील कर्मचारी, लाभार्थींशी संवाद साधतील. त्याचे थेट प्रक्षेपण सर्व लसीकरण केंद्रांवर केले जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
पिनकोडच्या आधारे लाभार्थी यादी
तांत्रिक मदतीच्या आधारे पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. को-विन ऍपवर लाभार्थी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्यांच्या पत्याची माहिती त्या-त्या लसीकरण केंद्राच्या पिन कोडसोबत (पत्ता) जोडण्यात आली आहे. त्यामुळे को-विन ऍप प्रणालीवर केवळ संबंधित लसीकरण केंद्राचा पिनकोड टाकल्यास त्या क्षेत्रातील लाभार्थीची माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकणार आहे.
दहा हजार पिनकोड
केंद्र सरकारने राज्यांना त्यांच्या अंतर्गत असलेले जिल्हे, गावे यांची माहिती पाठवली आहे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या अखत्यारित असलेल्या भागांच्या पिनकोडची माहिती पाठवली आहे. जवळपास दहा हजार पिनकोड आणि त्यांच्या परिक्षेत्रात येणारे सर्व गावे यांची माहिती यामध्ये आहे. या आधारे लाभार्थीची माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकणार आहे.
लाभार्थींना पाठवले “एसएमएस’
प्रत्येक केंद्रावरील पहिल्या शंभर लाभार्थींना “एसएमएस’ पाठवण्यात आले असून, त्यांचे केंद्र कोणते, त्यांनी कोणत्या वेळेत केंद्रावर पोहोचायचे आहे या सगळ्यांचा तपशील यामध्ये आहे.
ओळखपत्र आवश्यकच
लसीकरणासाठी येताना लाभार्थी व्यक्तीने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. यासाठी 12 प्रकारची ओळखपत्रे चालतात. (त्यातील एक आणायचे) यामध्ये आधारकार्ड महत्त्वाचे असून, आधार आणि मोबाइल नंबर हे “ऍटॅच’ असणे आवश्यक आहे. आधार नंबर सांगितल्यानंतर संबंधिताला मोबाइलवर ओटीपी नंबर येईल, तो सांगितल्यानंतर लाभार्थीची ओळख पटल्याचे गृहित धरून त्याला लस दिली जाईल.
आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यात 511 केंद्र ठरवले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी केंद्रांची संख्या कमी करून ती 358 करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी ती आणखी कमी करून 285 केंद्र अंतिम केली आहेत.
– डॉ. दिलीप पाटील, राज्य लसीकरण प्रमुख