पुणे (प्रतिनिधी) – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया थंडावली आहे. आता लॉकडाऊन उठल्यानंतरच भरतीची पुढील प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रामुख्याने खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक भरती ही राज्यातील जिल्हा बंदी उठल्यानंतर करता येणार आहे हे स्पष्ट झाले आहे. शिक्षक भरतीचे वेळापत्रकच कोलमडले आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दीड वर्षापूर्वी घेतला होता. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावे यासाठी पवित्र पोर्टलही कार्यान्वित करण्यात आले. या भरती प्रक्रियेत सुरुवातीपासून कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचे अडथळे येतच आहेत. पोर्टलमधील तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल झालेल्या याचिका, उमेदवारांना पोर्टलवर माहिती अपडेट करण्यासाठी सतत देण्यात आलेली मुदतवाढ, पात्र असतानाही निवड यादीत संधी न मिळणे, उमेदवारांची आंदोलने, शिक्षण आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी उमेदवारांमध्ये लागलेली स्पर्धा यामुळे भरती प्रक्रियेत अनेकदा व्यत्ययच निर्माण झालेला आहे हे स्पष्ट आहे.
त्यातच आता गेल्या महिन्यापासून करोना विषाणूचा वाढता प्रभाव हा शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. आधी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर 3 मे पर्यंत ते वाढविण्यात आले आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी मार्च अखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये अशीच भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.
राज्यात 12 हजार 140 शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठीचा कार्यक्रम आखण्यात आला होता. निवड यादीतील सुमारे 6 हजार उमेदवारांना शाळांमध्ये नोकरी मिळाली आहे. कागदपत्रांची पडताळणी करण्यास गैरहजर राहिलेल्या, अपात्र ठरविण्यात आलेल्या सुमारे 300 उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्याबाबतचा विचारही सुरु आहे. माजी सैनिकांच्या 1 हजार 200 जागांसाठी आरक्षणनिहाय उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे या जागा कव्हर्ट करण्यात येणार आहेत.
खासगी शाळांमध्ये मुलाखती घेऊन उमेदवारांची शिक्षक भरती करण्यात येणार आहे. यात 850 शैक्षणिक संस्थांमधील 3 हजार जागा भरण्यात येणार आहे. या उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी संधी देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवावे लागणार आहे. ही खासगी शाळांमधील भरतीही लॉकडाऊन उठल्यावरच राबविण्यात येणार आहे. त्यातही जिल्हा बंदी शिथिल झाल्यानंतरच हा भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. उमेदवारांसाठी शिक्षक भरती बाबत वेळोवेळी योग्य त्या सूचना पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.