पुणे – ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. लक्षणे दिसताच आणि अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर बाधितांना तत्काळ औषधोपचार मिळाले तर अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढणार नाही. तसेच रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन किट बसविण्यात यावे, जेणेकरून जिल्ह्यातील मृत्युचे प्रमाण कमी होईल. असे जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायी समिती बैठकीत सांगितले. त्यावर जिल्हा परिषदेकडून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समन्वयाने उपाययोजना करण्यात आली. कशाप्रकारे ही परिस्थिती हातळायची याबाबत अध्यक्ष निर्मला पानसरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सूचना दिल्या.
जिल्हा परिषद अध्यक्षा पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती बैठकीत झाली. यावेळी ग्रामीण भागात वाढलेला करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी तत्काळ पावले उचलावी. तालुक्यातील प्रत्येक सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि औषधोपचार सुविधा मिळावी, अशी मागणी सदस्यांनी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती बाबूराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, गटनेते शरद बुट्टे पाटील, आशा बुचके, दत्तात्रय झुरूंगे यासह अन्य सदस्य, अधिकारी उपस्थित होते.