नागपूर : मागील एक वर्षापासून डोकेदुखी ठरत असलेला करोना मध्यंतरी अटोक्यात आल्याचे चित्र होता. मात्र आता पुन्हा रुग्मसंख्या वाढत आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हेच चित्र आहे. तर काही जिल्ह्यात दिवसाला हजारहून अधिक रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे.
विदर्भातील अमरावती आणि वाशीम जिल्ह्यात रुग्णवाढीमुळे करोना नियम कडक करण्यात आले होते. तर अमरावतीमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. आता विदर्भाची राजधानी समजल्या जाणाऱ्या नागपुरात रुग्णवाढीने वेग घेतला आहे. नागपुरात एका दिवसांत १००० हून अधिक रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. रुग्णवाढीचा वेग अनेक दिवस १०० ते २०० एवढा होता. मात्र आता हा आकडा हजारच्या पुढे गेला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
नागपूरमध्ये मागील २४ तासांत ११८३ नवीन रुग्णांची वाढ झाली. सलग चौथ्या दिवशी १००० हून अधिक रुग्ण वाढल्याचे सांगण्यात आले आहे. मागील २४ तासांत येथे ९ जणांना मृत्यू झाला आहे. तर सक्रीय रुग्णांच्या संख्येने १० हजारचा आकडा पार केला आहे. येथं बरं होणाऱ्यांची एकूण संख्या १ लाख ४१ हजार २२९ आहे. तर मृतांची संख्या ४ हजार ३८३ एवढी आहे.