नवी दिल्ली: करोनाबाधितांची संख्या गुरूवारी 694 इतकी झाली. त्या विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 या आजाराने आतापर्यंत देशभरात 16 जणांचा बळी घेतला आहे.
देशात सर्वांधिक करोनाबाधितांची नोंद केरळ आणि महाराष्ट्रात झाली आहे. कर्नाटकात त्या विषाणूची लागण झालेले 55 रूग्ण आढळले आहेत. त्याशिवाय, 35 हून अधिक करोनाबाधित असलेल्या राज्यांत तेलंगण, गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्लीचा समावेश आहे. गोव्यात बुधवारी प्रथमच 3 करोनाबाधित आढळले. देशातील बहुतांश राज्यांमध्ये करोनाबाधित आढळल्याने संपूर्ण देश त्या विषाणूविरोधात लढा देण्यासाठी सज्ज झाला आहे.
देशातील बहुतांश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सरसावल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांमुळे करोनाविरोधी लढ्यासाठी संपूर्ण देश एकवटल्याचे चित्र आहे. दरम्यान, भारतात नोंद झालेल्या करोनाबाधितांमध्ये सुमारे 50 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.