मुंबई – रेमडेसिविर इंजेक्शनशिवाय 800 हून अधिक रुग्णांना बरे करण्याची किमया महाडमधील डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी करुन दाखवली आहे. रेमडेसिविरशिवाय रुग्ण बरा होत नाही, या मानसिकतेसंदर्भात डॉ. बावस्कर एका खासगी वाहिनीशी बोलताना म्हणाले की, “कोविडवर सुरुवातीला कोणताही उपाय नसल्याने काही जरी वापरले तर ते महत्त्वाचे आहे अशी भावना निर्माण झाली.
रेमडेसिविरचा भारतीय वैज्ञानिकांनीच शोध लावला. मीडियाने रेमडेसिविरला उचलून धरले, मग डॉक्टरांनीही तेच केले. ग्रामीण भागात रेमडेसिविर उपलब्ध नव्हते. पण त्यामुळे रुग्णांना मरू द्यायचं का तर नाही. त्यासाठी पर्याय शोधला. त्यानंतर समजलं की रेमडेसिविरची गरजच लागत नाही. रेमडेसिविर देण्यासाठी क्रायटेरिया असतो. ज्याप्रमाणे मीडियात सांगितलं जातं तेवढी त्याची गरज नाही.”
लोकांच्या मनात रेमडेसिविरविषयी एक ग्रह तयार झाला आहे. मृत्यूदरामुळे करोनाबाबत भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत काही होणार नाही, असा विश्वास डॉक्टरांनी रुग्णांना द्यायला हवा, असे ते म्हणाले. “रुग्णांना रेमडेसिविर प्रीस्क्राईब करु नये हे सरकारने उशिरा सांगितले. कोणाला रेमडेसिविर द्यावं याबाबत सरकारने ऑडिट केले पाहिजे,” अशी सूचनाही त्यांनी केली.
“मी आतापर्यंत एकाही रुग्णासाठी रेमडेसिविर इंजेक्शन वापरलं नाही आणि कोणालाही ते घेण्याचा सल्ला दिला नाही. शिवाय कोणीही माझ्याकडे याबाबत विचारणा केली नाही. उच्च आणि मध्यमवर्गीयांमध्ये रेमडेसिविर प्रचलित आहे. खेड्यांमध्ये रेमडेसिविर आले नाही. माझ्याकडे कोणी रेमडेसिविर मागत नाही आणि वापरलं जात नाही, असे बावस्कर म्हणाले.