नवी दिल्ली – तबलिगी जमातचा दिल्लीत निजामुद्दीन भागात मार्च महिन्यात जो कार्यक्रम झाला त्यामुळेच अनेकांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला असा दावा सरकारतर्फे संसदेत अधिकृतपणे करण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिलेल्या एका लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.
त्यांनी या उत्तरात म्हटले आहे की, मार्च 29 पासून तबलिगी जमातच्या मुख्यालयातून 2361 लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले, तसेच दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी 233 जणांना अटक केली. तथापि, जमातचे प्रमुख मौलाना साद यांना अजून याप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही. त्यांचा तपास सुरू आहे, असेही मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
त्यांनी म्हटले आहे की, करोनाच्या संबंधात विविध अधिकाऱ्यांनी आदेश जारी करूनही ते झुगारून करोनाविषयीचे कोणतेही निर्बंध न पाळता तबलिगी जमातचे हे अधिवेशन बंद जागेत घेतले गेले. त्यातून करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला, असे सरकारचे म्हणणे आहे.