नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. कडाक्याची थंडी, प्रदूषणाचा भर आणि दिवाळी निमित्त ओसंडून वाहणारी गर्दी यामुळे दिल्लीतील पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत कोरोनाच्या 1 लाख 1 हजार 70 नव्या प्रकरणांची नोंद झाली आणि 16 नोव्हेंबरपर्यंत 1202 जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत गेल्या आठवड्यापासून कोरोनामुळे रोज 85 ते 100 जण मृत्युमुखी पडत आहेत. विक्राळ रूप धारण करीत असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी बाजारपेठा तात्पुरत्या बंद करण्याची मागणी केजरीवाल सरकारने नायब राज्यपालांकडे केली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल वृत्त दिले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यांना लॉकडाउनसाठी केंद्राची मंजुरी आवश्यक आहे. त्यानुसार केंद्राकडे स्थानिक बाजारपेठांमध्ये लॉकडाउन लावण्यासाठी मंजुरी मागितली असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. कोरोनाविरोधातील लढ्यात दिल्ली सरकारसोबत केंद्र सरकारही उतरले असून लवकरच लॉकडाउनबद्दल निर्णय घेतला जाईल.
दिल्ली प्रमाणे देशातील इतर राज्यांमध्ये सुद्धा दिवाळी निमित्त बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा मोदी सरकार संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.