जगामध्ये तीन हजारांवर लोकांचा बळी घेऊन आर्थिक आपत्ती निर्माण करणाऱ्या करोना विषाणूची काळजी भारतालाही भेडसावणार आहे. देशात काहीजणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून, संशयितांच्या संख्येत भर पडत आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राने चार देशांच्या नागरिकांचा व्हिसा तूर्त रोखला आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रासह देशभरातील राज्ये एकत्रितरीत्या काम करत असून भीती बाळगण्याची गरज नाही. आरोग्यविभाग पूर्णपणे दक्ष असून, हा विषाणू पसरू नये म्हणून वैयक्तिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे; परंतु तरीही काळजी वाटण्यासारखीच स्थिती आहे, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे या घडामोडींचा भांडवली बाजारावर परिणाम झालाच. वित्त बाजारावरील करोना संसर्गाच्या परिणामावर आमची करडी नजर आहे, असे रिझर्व्ह बॅंकेने सांगितल्यानंतर शेअरबाजाराने उभारी घेतली.
जागतिक स्तरावर भांडवली बाजारात या आजार साथीच्या परिणामी प्रचंड अनिश्चितता आणि पडझडीचे वातावरण आहे. गुंतवणूकदार सोने व तत्सम अन्य सुरक्षित पर्यायांकडे वळला आहे. करोनाचा सगळ्यात जास्त फटका चीनला बसला असून, साठ देशांत त्याची लागण झाली आहे. फ्लूप्रमाणेच वयस्क व आजारी लोकांवर या विषाणूचा परिणाम होण्याची अधिक शक्यता असते. भारतात पुरेसे सॅनिटायझर्स आणि फेस मास्क उपलब्ध नाहीत. तेव्हा त्यांचे उत्पादन वाढवण्याची संधी आहे; परंतु हे होईपर्यंत आपले डोळे, नाक व तोंड यांना सतत स्पर्श करण्याचे टाळून, स्वसंरक्षण करता येऊ शकते. यावरील उपाय म्हणजे, सार्वजनिक सेवासुविधांवरील खर्च वाढवणे. तसेच सरकारने खासगी आरोग्य क्षेत्राला मूलभूत व पायाभूत सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
भारताची लोकसंख्या प्रचंड असून, देशात एका भागातून दुसऱ्या भागात प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे करोनाचा प्रसार वेगाने होण्याची भीती आहे. करोनाला तोंड देण्यासाठी दक्षिण कोरिया सिद्ध असून, तरीदेखील त्याचा तेथे फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. करोना विषाणूच्या टेस्टिंग किट्सचे उत्पादन भारतास वाढवावे लागेल. जगभरातून या किट्सना मोठ्या प्रमाणावर मागणीसुद्धा आली. इस्पितळांतून व्हेंटिलेटर्सचा पुरवठाही वाढवण्याची गरज आहे.
डॉक्टर्स व नर्सेससाठी संरक्षक कपडे आणि अन्य साधने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. काही विषाणूविरोधी औषधे सुचवली जात आहेत. ती परिणामकारक असल्याचे सिद्ध झाल्यास, केंद्रीय औषध मंत्रालयाने देशी उत्पादकांसाठी कंपल्सरी लायसन्सेस उपलब्ध करून दिली पाहिजेत. परदेशांतील सरकारांनाही असे परवाने उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्याची गरज आहे. अल्प खर्चात गुणवत्तापूर्ण औषधे बनवण्याचे कौशल्य भारताकडे आहे. करोनाग्रस्त जगाने याचा फायदा करून घेतला पाहिजे. अर्थात, सध्या चीनमधून होणारा बल्क ड्रग्जचा म्हणजे मूलभूत औषधांचा पुरवठा कमी झाला आहे. याचा भारतालाही फटका बसत आहे.
मूलभूत औषधांचे उत्पादन करण्याची भारतातील सार्वजनिक उपक्रमांची व खासगी उद्योगांची क्षमता आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस तयार करण्याकरिता जगातील अनेक देश प्रयत्नशील आहेत. जानेवारी महिन्यात चिनी वैज्ञानिकांनी या दिशेने एक पाऊल टाकले होते. त्या आधारावर जगातील अन्य संशोधकांनी व कंपन्यांनी लस निर्माण करण्याचे प्रयत्न चालू ठेवले आहेत. कोडाजेंटिक्स या अमेरिकन सिंथेटिक बायॉलॉजी कंपनीने या दिशेने काही प्रयत्न केला असून, पुण्याची प्रसिद्ध सिरम इन्स्टिट्यूट महत्त्वपूर्ण संशोधन करत आहे. लसनिर्मितीमध्ये बायॉलॉजिकल आव्हान असते. तसेच त्यात गणिती व डेटा मॉडेलिंगचे आव्हानही असते.
या क्षेत्रात भारतातील स्टार्टअप कंपन्यांना मोठ्या प्रमाणावरील संधी निर्माण होतील. लसनिर्मिती करणाऱ्या औषध कंपन्यांबरोबर काम करण्यासाठी देशातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना बायो-इन्फर्मेटिक्सचे स्वतंत्र विभाग स्थापन करता येऊ शकतील. रोडावलेल्या निर्मिती क्षेत्रामुळे भारताचा विकासदर 4.7 टक्क्यांवर, म्हणजेच सात वर्षांतील नीचांकावर आला आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेने यापूर्वीच तिचा तळ गाठला असून, यापुढे उभारीचे संकेत दिसून येतात, असे वक्तव्य केंद्रीय आर्थिक सचिव अतनू चक्रवर्ती यांनी केले आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी)ने म्हटले आहे की, 2020 मध्ये भारताचा विकासदर 110 बेसिस पॉइंट्सने घटून, तो 5.1 टक्क्यांवर जाईल.
करोनामुळे व्यवसाय-उद्योगातील तसेच वित्त बाजार व पर्यटन क्षेत्रातील धंद्यांवर परिणाम होणार असून, पुरवठा साखळीस फटका बसेल, असा अंदाज ओईसीडीने व्यक्त केला आहे. अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवर करोनाचा परिणाम होणार आहे. चीनचा विकास आटणार आहे, हे तर स्पष्टच आहे. तेथील कंपन्यांची थकित कर्जे वाढणार आहेत. याचा फायदा भारत व ब्राझीलसारख्या देशांना होऊ शकतो; परंतु त्यासाठी आर्थिक सुधारणा आणाव्या लागतील. तसेच भारतातील थकबाकीग्रस्त बॅंकांना वळणावर आणावे लागेल. अनेकांना असे वाटते की, चीनची अर्थव्यवस्था खड्ड्यात गेली की त्याचा भारताला फायदाच होईल; परंतु याची दुसरी बाजू आपण लक्षात घेत नाही.
उदाहरणार्थ, चीनला भारतातून मोठ्या प्रमाणावर कापसाची निर्यात होते. आता ही निर्यात घटली असून, त्यामुळे भारतातील खास करून महाराष्ट्रातील कापूस पिकवणारा शेतकरी अडचणीत आला आहे. 2002-03 मध्ये सार्सचा संसर्ग झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था विपत्तीत सापडली होती; परंतु त्यावेळेपेक्षा आज जागतिक अर्थव्यवस्था अधिक परस्परसंलग्न बनली आहे. चीन एक महाशक्ती म्हणून उदयास आला आहे. 2002-03 मध्ये भारत-चीनचा व्यापार सुमारे पाच अब्ज डॉलर्स इतका होता. तो जवळपास 18 पटींनी वाढून 87 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला आहे. करोनाने भारतास काही क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होणार आहे. त्याचवेळी आयात-निर्यात व्यापारास झळही पोहोचणार आहे.