लखनौ – देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील हतबल झाली असून रुग्णांना आरोग्य सुविधांअभावी प्राण गमवावा लागत आहे. उत्तर प्रदेशातील स्थिती आणखीनच भयंकर आहे. ऑक्सिजन कमी झाल्यास खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यामुळे आर्थिक ताण येत आहे. आर्थिक स्थितीमुळे एकाने मला देशाच्या भरवश्यावर सोडून द्या म्हणत, जीव सोडला.
उत्तर प्रदेशातील लखनौ येथील ही हृदयद्रावक घटना आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या एका मुलानं चार मे रोजी संध्याकाळी आपल्या वडिलांसोबत फोनवर चर्चा केली. तो म्हणाला, माझ्या उपचारासाठी आईचे दागिने विकले. तुमच्या खात्यामध्ये जे पैसे होते तेही संपले. आता मला असं समजलं की तुम्ही उन्नाव बायपासवरील घर तारण ठेवण्याचा विचार करत आहात. माझ्यावर उपचार करण्यात सगळं संपून जाईल. मग पम्मीचं (बहीण) लग्न कसं होणार. मी वाचेल की नाही हे नक्की नाही. त्यामुळे, मला देवाच्या विश्वासावर सोडून द्या.
आपल्या पित्यासोबत झालेल्या संभाषणानंतर शुक्रवारी करोनाबाधित मुलाचं निधन झालं आहे. उन्नावचे रामशंकर यांच्या घरात 17 एप्रिल रोजी करोनाने शिरकाव केला. त्यांची पत्नी जलज आणि 23 वर्षीय मुलगा सुशील याला कोरोनाची लागण झाली. यातून पत्नी तर बरी होत आहे. मात्र मुलाची प्रकृती गंभीर होत गेली. सरकारी रुग्णालयात बेड न मिळाल्याने मुलाला लखनौ येथील खासगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुशीलच्या वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने मोडून सुमारे ३.३० लाख रुपये रुग्णालयात भरले. त्यानंतर घरही तारण ठेवण्याचा त्यांचा विचार होता. मात्र सुशीलला हे कळलं. त्याने वडिलांना अस न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सुशीलच्या मृत्यूचं वृत्त घरी कळलं.