पुणे – शहरातील जवळपास सर्व नागरिकांचा करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस झाला आहे; परंतु अद्याप सर्वांचा दुसरा डोस पूर्ण झालेला नाही. कागदोपत्री तीन लाख जणांचे डोस राहिले असले, तरी प्रत्यक्षात आठ ते दहा लाख जणांचे डोस घेणे राहिले आहे, अशी माहिती उजेडात आली आहे. याच व्यक्तींमुळे आता करोना संसर्गाचा धोका आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने पुण्यातील करोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या व्यक्तींची संख्या 33 लाख अपेक्षित धरली आहे. मात्र प्रत्यक्षात ती 37 ते 38 लाखांपर्यंत आहे. त्यातून ग्रामीण भाग आणि पिंपरी-चिंचवडमधून पुणे शहरात येऊन लस घेणाऱ्यांचीही संख्या जास्त होती. त्यामुळे प्रत्यक्षात ही आकडेवारी जास्त आहे.
पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या पाहता दुसरा डोस घेणारेही तितकेच असणे साहजिकच अपेक्षित आहे. त्यामुळे त्यासाठीही 37-38 लाख डोस मिळणे अपेक्षित आहे. परंतु केंद्राने 33 लाखच धरल्याने तेवढेच डोस जर दुसऱ्या डोससाठी मिळाले तर अन्य नागरिकांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्राने लाभार्थींच्या संख्येनुसार नियोजित केलेले डोस तेवढी लाभार्थी संख्या पूर्ण झाली की, देणे बंद करणार का, केले तर उरलेल्या लाभार्थींचे काय, हा प्रश्नही या निमित्ताने निर्माण झाला आहे.
लाभार्थींची गृहित धरलेली संख्या संपली, तर लसीचा कोटा येणार नाही. गोव्यामध्ये लसीकरण पूर्ण झाले, असे गृहित धरून ते बंद केले आहे. परंतु आपल्याकडे अद्याप दुसरा डोस पूर्ण झालेला नाही. याविषयी राज्यसरकारला कळवले जाईल आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यात येईल.
– डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण विभाग प्रमुख, पुणे महापालिका